सांगली : खबऱ्या प्रतिनिधी/सांगली जिल्ह्यात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आलीय.
तीन लेकींसह आईचाही तलावात बुडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तलावातील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. ज्या तलावाजवळ धुण्याचे कपडे आणि साबण आढळून आला, त्याच तलावात तीन मुली आणि एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचं पाहून सगळेच हादरले.
समोर आलेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळूर गावातील तलावात 4 जणांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पडून चारही जण मृत्यूमुखी पडले. या सर्व मृतदेहांची ओळखही पटली असून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
जतमधील ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहांची तपासणी केली जाते आहे. तसंच स्थानिक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.मृत्यू झालेल्यांची नावं सुनिता माळी, अमृता माळी, अश्विनी माळी आणि ऐश्वर्या माळी अशी आहेत.
मृत सुनिता माळी ही तलावात आढळलेलेल्या अन्य लहान मुलींची आई आहे, अशी माहिती समोर आलीय. सुनिता आणि तिच्या मुली पाण्यात नेमक्या कशामुळे बुडाल्या, याचं गूढही वाढलंय.
प्राथमिक माहितीनुसार, सुनिता माळी यांच्या घराजवळ एक तलाव आहे. या तलावाजवळ कपडे धुण्यासाठी त्या गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या तिन्ही मुलीही होत्या. साबण, धुण्यासाठीचे कपडे तलावाच्या जवळ आढळून आले आहेत.
त्यावरुन कपडे धुवत असताना तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला, असावा अशी शंका घेतली जाते आहे. सांगली जिल्ह्यातील्या जत तालुक्यातील पोलीसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.
मृत्यू झालेल्यांची नावं :
सुनीता माळी (वय 30),
अमृता माळी (वय 13),
अश्विनी माळी (वय 10)
ऐश्वर्या माळी (वय 7)
संपूर्ण माळी कुटुंबीयांना या घटनेनं मोठा धक्का बसलाय. अख्खं बिळूर गाव या घटनेनं हादरुन गेलंय. तलावात चारही जण पडल्या कशा, त्याच्या बुडून मृत्यू होण्यामागचं नेमकं कारण काय? याचं गूढही वाढलंय. हा अपघात होता की घातपात, या संशयावरुन अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आता पोलिसांच्या चौकशीतून नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.