वाळू तस्करांना प्रशासन सामील असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील शेळकबाव येथे बुधवारी रात्री काही वाळू तस्करांनी अवैध वाळू तस्करीची तक्रार केली हे कारण सांगून शेतकऱ्यांना जबरी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षात वाळू तस्करांना प्रशासनाची छुपी साथ असल्याचा गंभीर आरोप केला असून अवैध वाळू तस्करांकडून एखाद्या शेतकऱ्याचा मुडदा पडण्यापूर्वी महसूल प्रशासनाने जागे व्हावे अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत खबऱ्याला घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शेळकबाव येथून जेसीबीच्या साहाय्याने राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असतो याबाबत स्थानिक तलाठी ,मंडळ अधिकारी व वरिष्ठांना वारंवार कळवले तरी कोणतीही कारवाई होत नाही. शेतकरी बुधवारी सकाळी नदीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असता आपल्या विहिरीच्या आसपास जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा झाल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. वाळू तस्करांनी पाईप व मोटरच्या वायरचे नुकसान केल्याचेही लक्षात आले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने विहिरीतील सामाइक पाळीकरांना बोलवून घेऊन तलाठी यांना संपर्क साधला असता तलाठी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व वरिष्ठांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर मंडळ अधिकारी मीटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले. शेवटी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर लगेचच तलाठी व मंडळाधिकारी यांनी शेळकबाव येथे भेट दिली व आता अंधार झाला आहे उद्या सकाळी पंचनामा करू अशी सबब सांगून तसेच सध्या नदीत येणारा रस्ता फक्त जेसीबीच्या साह्याने बंद करतो, असे सांगितले.रस्ता बंद केल्यानंतर तलाठी परत जात असताना त्यांच्याबरोबर तक्रारदार शेतकरी होते ,यावेळी त्यांना एक अवैध वाळूचे वाहन समोरून जाताना दिसले .तलाठी यांनी ते वाहन पकडले ते वाहन तलाठी हे कडेगाव ला घेऊन गेले. त्यावेळी वाळू तस्करांनी तलाठी यांचे बरोबर असणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करून सदर वाहन सोडायला लावा तुम्ही आमचं वाहन धरून दिल आहे, असे सांगत वादावादी करण्यास सुरुवात केली. यातून वादावादी नंतर वाळूतस्करांनी त्या दोन शेतकऱ्यांना जबरी मारहाण केली. शेतकऱ्यांना मारहाण केल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी चिंचणी वांगी पोलीस स्टेशन गाठत शेतकऱ्यांच्या वरच मारहाणीची तक्रार दाखल केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच आमची माहिती महसूल मधीलच कोणीतरी वाळू तस्करांना दिली असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. तर इकडे शेतकऱ्यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची ही तक्रार चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली आहे.
यात चिंचणी वांगी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून महसूल प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे येरळाकाठच्या शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे वाळूतस्करांकडून शेतकऱ्यांना वारंवार दमदाटी केल्याच्या घटना काही नवीन नाहीत तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांना धक्काबुक्की ही झाली आहे मात्र बुधवारी रात्री शेतकऱ्यांना जबरी मारहाण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे तसेच संतापाची लाटही उसळली आहे . महसूल प्रशासनाने वेळीच सावध पावले उचलावी व वाळूतस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

