मिरज : खबऱ्या प्रतिनिधी | ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि जनतेच्या कामासाठी रात्रंदिवस राबलेल्या ठराविकच देवमाणसांमुळे मिरजेला मधल्या काळात चांगले दिवस आले. मिरज हे किरकोळ शहर नाही तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागावरील मोठं शहर आहे. सांगली- मिरज- कुपवाड या महानगरपालिकेच्या काही दांडग्या कारभाऱ्यांमुळे आणि (उं) – डग्या लोकसेवकांमुळे या मिरजेचे वाटोळं झालं आहे. होय..! वाटोळंचं म्हणायला हवे. कारण सांगली शहरातील विकास कामांच्या तुलनेत मिरजेच्या बाबतीत नेहमीच दुजाभाव केला जातोय. आज पर्यंत महानगरपालिकेचे ‘महापौर’ म्हणून मिरजेला बऱ्याचदा संधी मिळाली . ‘स्थायी समिती सभापती’ म्हणून कित्येकांनी खुर्ची उबवली. पण मिरजकर नागरिकांच्या नशिबात मात्र चिखलाची राड आणि खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि त्यावर करायला लागणारी कसरत हेच आहे. आम्हा मिरजकरांच्या पसंतीने निवडून दिलेले (फुटक्या नशिबाच्या असा अर्थ पकडावा)कपाळ करवंट्या नगरसेवकांच्या नशिबाची भोकं विकास कामासाठी आलेल्या निधीला पडल्याने ‘टक्केवारी आमचा जन्मसिद्ध हक्क’ आहे. हेच यांच्या बाबतीत दिसून येते..?
एकीकडे महाराष्ट्राचे राजकारण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू असताना याच महाराजांच्या नावाचा आणि मिरज शहरातील अति महत्वाचा असणारा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग खड्डयात जाऊपर्यंत आणि उन्हाळ्यात त्याची धूळ लोकप्रतिनिधींच्या ढुंगणापर्यंत तर पावसाळ्यात कमरेभर पाण्यात चिखलाची रोजची रंगपंचमी खेळूपर्यंत का बरं रखडला असेल. मिरजेला लाभलेलं उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व आणि कार्यसम्राट म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या दमदार आमदार साहेबांनी याच रस्त्याच्या उदघाटनाचा तीन वेळा नारळ फोडला. पण काम अजून पूर्ण का नाही झाले ..? फोडलेला नारळ नासका निघाला न्हवता मग आलेला निधी वापरून कामाचा आलेख का फुसका निघाला..? हा प्रश्न प्रत्येक मिरजकर विचारत आहे.
टक्केवारीच्या भानगडीत काही अडलं असेल तर कोणाला किती टक्केवारी पाहिजे हे स्पष्टपणे मागा, आम्ही मिरजकर पै- पै गोळा करून तुमची तीही खादाड पणाची भूक भागवतो. निवडणुकीत पंचवीस-तीस लाख उधळून कोट-दीड कोट मिळाले असतील तर ,तुमची भसम्या रोगाची भूक भागली असेल तर कृपया, “नगरसेवकानू आमच्याकडे बघा आता..या शहरातील खड्डयामुळे अन खड्डयात गेलेल्या रस्त्यांमुळे गाड्या गॅरेजमध्ये आणि गाडी चालक हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे.”
मिरज शहराला मिळालेला एवढा मोठा निधी नेमका गेला कुठे..? कोणत्या बिळात गेला..? कोणत्या भोकात गेला ..? असा संतप्त सवाल करीत मिरजकर नागरिक या कारभाराबाबत आता आक्रमक होऊ लागलाय.
मिरजकरांच्या तोंडातून प्रशासनाच्या बाबतीत येणाऱ्या शिव्या म्हणजे हा तर तुमच्या आईचा अपमान नाही का..? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने उद्यापासून आक्रमक पवित्रा घेऊन प्रशासनाला मिरजेतील रस्ता करायला भाग पाडा. अन्यथा जनाक्रोश झाला तर जनता तुम्हाला खाली पाडून लाथा घातल्याशिवाय राहणार नाही.
– तूर्तास इतकचं..!