भ्रष्ट कारभारात मंडळ अधिकाऱ्याची तलाठ्याला साथ..!
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातून पलूस तालुक्यात बदली होऊन गेलेल्या वादग्रस्त तलाठ्याने वारसनोंद धरताना वारसा रजिस्टरला न नोंदविताचा त्याचा फेरफार धरला व मंडळ अधिकाऱ्यांनी तो मंजूर ही केला इतकेच नव्हे तर सदर फेरफार वारसनोंद म्हणून न धरता इतर फेरफार मधून धरला गेल्याचं समोर येत आहे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी भ्रष्ट कारभाराच्या सर्व सीमा ओलांडल्या असून पीडित कुटुंब लवकरच वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे समजते.
वादग्रस्त तलाठ्याचे आता एका पाठोपाठ एक असे भ्रष्ट कारनामे बाहेर येत असून अतिरिक्त कार्यभार असताना सातबारा एकाचा आणि वारसनोंद दुसऱ्याची अशी किमया संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केली खरी मात्र ती ही करीत असताना कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याचे समोर येत आहे. वारसनोंद धरीत असताना कायद्याने त्याची अगोदर वारसा रजिस्टर ला नोंद करून ते वारसा रजिस्टर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावे लागते, व त्याच्या वारसनोंदीचा फेरफार धरताना सदर फेरफार मध्ये मंजूर वारसा रजिस्टर नंबर नमूद करावा लागतो त्याशिवाय फेरफारच धरला जात नाही. मात्र याठिकाणी संबंधित तलाठ्याने पूर्ण वारसनोंदच बेकायदेशीर धरायची आहे असे बहुधा ठरवले असल्याने त्याची वारसा रजिस्टरला नोंद केली नाही आणि त्यामुळे त्यास मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरीचा प्रश्न आला नाही.

आता वारसनोंदीचा फेरफार धरताना वारसा रजिस्टर नंबर टाकावा लागणार म्हणून संबंधित तलाठ्याने फेरफार प्रकार वारसनोंद म्हणून न धरता इतर फेरफार म्हणून धरला. या ठिकाणी आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार किती दिवस राहील हे सांगता येत नसल्याने घेतलेली सुपारी कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी ह्या मधल्या आणि बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला गेला असणार असे जाणकारांचे म्हणणे आहे. मुळात वारसनोंद लवकर करायची म्हणून बेकायदेशीर मार्गांचा अवलंब त्यात संबंधित मयत शेतकऱ्याचे नाव ही नसणाऱ्या सातबारावर वारसांची नोंद ,म्हणजे भ्रष्ट कारभाराच्या सर्व सीमा ओलांडणे असे नाही का होत?. या प्रकरणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मयत पती पत्नी शेतकरी हे अनुक्रमे १९९९ व २००६ साली मयत झाले आहेत आणि त्यांची वारसनोंद २०२० ला या तलाठी महाशयांनी घातली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कडे येथील कार्यभार अतिरिक्त होता. यापुढं असं ही समजते की ही वारसनोंद घालण्यास यापूर्वी च्या तलाठ्यांनी नकार दिला होता. मात्र संबंधित तलाठ्याने चांगला मोबदला मिळत असल्याने ही नोंद मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून घालून दिली.
मयत शेतकरी ज्या जमिनीचे मालक होते किंवा जो सातबारा त्यांच्या नावावर होता त्याठिकाणी त्यांची वारसनोंद घातली असती तर कदाचित या प्रकरणाला वाचा फुटली नसती किंवा तसं जास्त कोणी मनावर ही घेतलं नसतं मात्र ज्या सातबारावर संबंधित मयत शेतकऱ्याचे नाव सुद्धा नाही तिथंही ह्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी वारसांची नोंद घालून कडेगाव तालुक्यात एक इतिहास घडविला आहे.
एकूणच या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणी साठी पीडित कुटुंब लवकरच सर्व कागदपत्रांसह वरिष्ठांना भेटणार असल्याचं समजते.