मुंबई | खबऱ्या प्रतिनिधी: राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत त्यांची आणि इतर आमदारांची उद्धव ठाकरेंवर असलेल्या नाराजीची कारणं सांगितली.
तसेच शिवसेना सोडणार नाही, दुसऱ्या पक्षात जाणार नाही, वेगळा पक्ष स्थापन करणार नाही, असाही स्पष्ट खुलासा शिंदेंनी केला. आमच्यासोबत शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार आहेत या शिंदेच्या दाव्याने शिवसेनेचं टेंशन वाढलंय. अशात आता बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्याने काँग्रेसला देखील धक्का बसणार असल्याचं दिसतंय.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवीन माहिती दिली आहे. कडू म्हणाले, मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, त्यांना मी गुवाहाटीला असल्याचं कळवलं आहे. त्यांनी तुम्ही परत या, असं आवाहन केलं पण आता पाणी डोक्यावरुन गेलं आहे. तसेच शिवसेनेसह काँग्रेसचे देखील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक खुलासा कडू यांनी केलाय.
आमदारांचं अपहरण करुन आणि त्यांना मारहान करुन सुरतमध्ये डांबलं आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावर बोलताना कडू म्हणाले, तसं काही घडलं नसून, सर्व आमदार खुशीने आले असून, कोणावरही बळजबरी केलेली नाही. सर्व आमदारांची आज सभा आहे. आम्ही सायंकाळपर्यंत निर्णय सांगू, असंही ते म्हणालेत.
पुढे बोलताना कडू म्हणाले, आमच्या या बंडाला शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांचा पाठींबा आहे. आणखीही आमदार आम्हाला जोडलं जाण्याची शक्यता आहे. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार नको आहे. आम्हाला 50 आमदारांचं समर्थन मिळेल, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

