मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : म्हैसाळमधील एकाच कुटुंबातील दोन्ही भावांनी त्यांच्या त्यांच्या घरात कुटुंबियांसोबत विष घेवून आपलं आयुष्य संपवले. या घटनेचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिकानगरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील एक भाऊ पशु वैद्यकीय डॉक्टर आहे, तर दुसरा भाऊ शिक्षक आहे. हे दोघेही भाऊ वेगवेगळे ठिकाणी राहत होते. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे असे दोन्ही भावांची नावं आहेत. या दोन्ही भावांनी त्यांच्या त्यांच्या घरात कुटुंबियांसोबत विष घेवून आपलं आयुष्य संपवले. या घटनेचे कारण अद्यापही समजू शकले नाही. दरम्यान याप्रकरणी पोलिसांना तपासात सुसाइड नोट आढळल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परंतु एका वेळी एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याने परिसरातही तणाव पाहायला मिळत आहे. शिवाय आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी 25 जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसही संभ्रमात
या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. प्रथम दर्शी घरात कोणत्याही प्रकाराची चोरी किंवा हत्या सदृश्य स्थिती आढळून आली नाही. त्यामुळे हे आत्महत्या असावे. मात्र फोरेन्सिक अहवाल आल्याशिवाय घटनेचे कारण सांगणे कठिण असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. शिवाय सगळ्या अंगाने आम्ही तपास करत आहोत, त्यामुळे सध्यातरी कोणत्याही घातपाताचा प्रकार समोर आला नसल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे तपासादरम्यान एक सुसाइड नोट आढळून आली आहे. त्यातील माहितीनुसार आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली आहे.

अशी आली घटना उघडकीस :
म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळील अंबिका नगर चौकात असलेल्या घरात डॉ. वनमोरे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांसह आढळून आला. अंबिका नगर चौकातील घराचा दरवाजा सकाळपासून उघडला नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि घरात सहा जण मृतावस्थेत पडलेले दिसले. इतर तिघांचे मृतदेह नंतर राजधानी कॉर्नर येथील दुसऱ्या घरात आढळले. दोन परिवारातील 9 जणांच्या सामूहिक आत्महत्येमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

अशी आहेत मृतांची नावे : पोपट यल्लापा वनमोरे (52), माणिक यल्लापा वनमोरे (49), रेखा माणिक वनमोरे (45), अनीता माणिक वनमोरे (28), आदित्य माणिक वनमोरे (15), अक्काताई वनमोरे(72), संगीता पोपट वनमोरे (48), अर्चना पोपट वनमोरे (30), शुभम पोपट वनमोरे (28)

शेजारीही धक्क्यात :
या दोन्ही भावांच्या घरांशेजारी राहणारे या घटनेनंतर पूर्णपणे धक्क्यात आहेत. कारणांची कुजबूज सुरु आहे, परंतु ठोस कारण कोणीही सांगू शकत नाही आहे. संपूर्ण कुटुंबच नाहीसे झाल्याने पोलीसही तपास कोणत्या दिशेने करायचा? या संभ्रमात आहेत.
मानसोपचार तज्ज्ञाचे मत :
या घटनेबाबत बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी माहिती दिली आहे. आत्महत्येच्या कुठल्या घटनेमध्ये महत्वाचे कारण मानसिक तणाव हा प्रामुख्याने आढळतो. शिवाय व्यवसायात आलेले अपयश सुद्धा अशा घटनांमध्ये कारण ठरु शकतात. त्यामुळे वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली आहे.

