संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणात संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या ‘त्या’ 17 पोलिसांच्या झालेल्या चौकशीचा अहवाल गृहविभागाकडे प्रलंबितच आहे.
दोन अधिकार्यांची पदोन्नती झाली. पण गृहविभागाने कारवाईबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने 17 पोलिसांची पदोन्नती थांबली आहे.
लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जाळण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, अरूण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सात जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील टोणे याचा कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मृत्यू झाला.
सांगली शहर पोलिस ठाण्यात दि. 5 नोव्हेंबर 2016 रोजी ही घटना घडली होती. अनिकेतला डीबी शाखेत उलटा टांगून मारहाण केली होती. त्यावेळी ड्युटीवर असणारे ठाणे अंमलदार, त्यांचे मदतनीस, लॉकअपचे चार गार्ड, वायरलेस, बेकर मोबाईलवरील पोलिस, असे 17 जण चौकशीच्या फेर्यात अडकले होते. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती.
चौकशीचा अहवाल गृहविभागाचे अव्वल सचिव दीपक पोकळे यांना सादर करण्यात आला होता. या गोष्टीला सहा वर्षे झाली तरी या अहवालावर गृहविभागाने कोणताच निर्णय घेतला नाही. अहवाल धूळखात पडला आहे. त्यामुळे या 17 पोलिसांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, सध्याचे दीक्षित गेडाम यांना हे 17 पोलिस अनेकदा भेटले. पण चौकशीचा ठपका असल्याने या अधिकार्यांनाही काहीच निर्णय घेता येत नाही.
याच प्रकरणातील तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे, उपनिरीक्षक समीर चव्हाण यांचीही चौकशी झाली. मात्र त्यांना पदोन्नती मिळाली आहे. काळे या अहमदनगर जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक, तर चव्हाण सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर पुण्यातील चतुश्रंगी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत.
पदोन्नती थांबविता येत नाही : न्यायालय
एखाद्या प्रकरणात पोलिस कर्मचार्यांची चौकशी सुरू असेल तर त्यांची पदोन्नती थांबविता येणार नाही, असे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निकाल आहेत. पण कोथळे प्रकरणातील 17 पोलिसांवर कारवाईबाबतचा निर्णय गृहखात्यांने विनाकारण प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे या पोलिसांना आहे त्या पदावरच काम करावे लागत आहे.