कोल्हापूर : खबऱ्या प्रतिनिधी ; २०१४ पर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा यावर चर्चा होत होती. आता टोपी, लाऊडस्पीकर, अजाण यावर चर्चा होते. लोकांच्या प्रश्नांवर विचार नाही. दोन कोटी नोकऱ्या देणार होता.
त्याचं काय झालं, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नरेंद्र मोदी सरकारला केला. आज शनिवारी (ता.२८) कोल्हापूर येथे पक्षाची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. महागाई दीडशे पटीने वाढली. हिंमत असेल तर चीनकडे जा ना. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पेट्रोलचा आकडा काय आहे.? १११ रुपये लिटर आहे. महाराष्ट्र, देशामध्ये आम्ही बोलत असतो. प्रश्न विचारत असतो. मग ईडी पाठवतात, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.
दापोलीचे रिसाॅर्ट चालूच झाले नाही. त्याचे पाणी समुद्रात जाते म्हणून कारवाई केली जाते? तुम्ही आर्थिक गुन्हे शोधणारे, सांडपाणीवरुन कारवाई करता असा प्रश्न राऊत यांनी अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर विचारला. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य चालू द्यायचे नाही. संजय पवार दिल्लीला चालले आहेत. जरा हळूहळू बोलण्याची सवय संजय पवारांनी लावून घ्यावी, असा सल्ला त्यांनी पवारांना दिला. आता सहाव्या जागेचा वाद सुरु झाला. देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने बदनामी सुरु केली होती. ती शाहू छत्रपतींनी हाणून पाडली आहे, या शब्दात राऊत यांनी संभाजीराजे यांच्या आडून भाजप करत असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संभाजीराजे यांचा गैरवापर केला. महाराष्ट्रावरच संकट दिल्लीच्या माध्यमातून येत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.


