मिरज :खबऱ्या प्रतिनिधी; कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे ५ जूनपासून कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस) नियमितपणे विजेवर धावणार आहे. यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना यापुढे रेल्वेच्या झुक झुक गाडीचा धूर दिसणार नाही.
तर विजेवर (इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने) गाडी सुसाट धावणार आहे.
प्रदूषण विरहीत रेल्वे प्रवासाची सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. यामध्ये कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा प्रवास जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. सध्या लोंढा-मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाची कामे वेगाने होणार आहेत. यामधील विद्युतीकरणाचा ऐकेरी मार्गावरील प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे. तर दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गावरून गाड्या विजेवर धावणार आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावरील विद्युतीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढणार असून, वेळेत पोहोचण्यास मदत होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी रेल्वे महाव्यवस्थापकांकडून कोल्हापूर ते पुणे या मार्गावरील विद्युतीकरण कामाची पाहाणी करून विजेवर गाड्या लवकरच सुरू करण्यासाठी हिरवा सिग्नल दिला होता. याच अनुषंगाने पहिल्या टप्प्यात मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस सोडण्याचे नियोजन पुणे विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र कोल्हापूर, मिरज स्थानकांना देण्यात आले आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना झुकू झुकू गाडीचा धूर यापुढे दिसणार नाही. यानंतर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस दुसऱ्या टप्प्यात नियमितपणे धावण्याची शक्यता आहे.


