मिरज :खबऱ्या प्रतिनिधी ;
विधवा आणि परित्यक्ता महिलांचा पुनर्विवाह करून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक ठराव मिरज तालुक्यातील इनामधामणीत संमत करण्यात आला.
अशा प्रकारचा ठराव करणारे इनामधामी हे राज्यातील पहिले गाव ठरणार आहे.
सरपंच अश्विनी कोळी, उपसरपंच अनिता पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र शिंदे, सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी यांसह बैठकीला महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या. उपसरपंच अनिता पाटील यांनी मांडलेल्या या ऐतिहासिक ठरावाला राजमती प्रकाश मगदूम यांनी अनुमोदन दिले. यावेळी महिला सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात ठराव सर्वानुमते मंजुरी दिली.
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद व शासनाच्या निधीतून विधवा व परित्यक्ता महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्याचा ठराव करण्यात आला. या निर्णयाचे सर्वस्तरातून समर्थन केले जात आहे. शासनाच्या आदेशान्वये काढण्यात आलेल्या अभ्यास दौर्याच्यानिमित्ताने विधवा व परित्यक्ता व विधवांच्या व्यथा जाणून घेता आल्या. त्यावेळी इनाम धामणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या घटकांसाठी काही करता येईल का, याकडेही लक्ष दिले.
ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्याने या ठरावाचे सर्वांनी समर्थन केले, असे सरपंच अश्विनी कोळी व उपसरपंच अनिता पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले. विधवा व परित्यक्ता महिलांच्या पुनर्विवाहाचा ठराव संमत करणारे सांगली जिल्ह्यातील हे एकमेव गाव आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून यासाठी काही निधीची तरतूद केली आहे. ती सार्थकी लावण्यासाठी समाजाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे ठरणार आहे, असे ग्रामविकास अधिकारी रविंद्र शिंदे यांनी सांगितले.


