आरग : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरज तालुक्यातील महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी व्यापारी बाजारपेठ आणि जवळपास वीस ते बावीस हजार लोकसंख्येचे मोठं गाव म्हणून आरग ओळखलं जाते. याच गावात फेब्रुवारी अखेर पासून पाणी टंचाई भासू लागली होती.
मार्च च्या मध्यंतरी पासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्यासाठी आरग मध्ये वणवा पेटला होता. पेटलेल्या वणव्यातून निघालेल्या उग्र ज्वाला आता लोकप्रतिनिधी आणि म्हैसाळ योजनेची पोकळ आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदरात पडणार आहेत. कारण, संयमाचा बांध तसा फुटलाच होता.परंतु, बळीराजाच्या आशीर्वादाने आणि मेघराजाच्या कृतीने तो सावरला गेला.
२ महिन्यांपासून गावात पाणी टंचाई सुरू झाली होती.त्या अनुषंगाने गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर ही सुरू केले होते. दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने आरग परिसरात समाधान व्यक्त होत आहे. परंतु, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. “नेत्यांना फोटोची गोडी मग लावणारच की लाडिगोडी” असा प्रत्यय प्रत्यक्ष आरग करांना आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये राजकारण झाले असून लोकप्रतिनिधी यांनी पोकळ आश्वासने दिल्याचा आरोप आरगकरांकडून होत आहे.