जयसिंगपूर; खबऱ्या प्रतिनिधी : येथील युवती व सांगवडेवाडीतील मुलगा यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. असे असताना मुलाने परस्पर दुसर्या मुलीबरोबर साखरपुडा करत असताना येथील युवतीने सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे हा साखरपुड्याचा कार्यक्रम हाणून पाडला.
त्यानंतर नातेवाईकांच्या चर्चेनंतर नृसिंहवाडी येथे दोघांचे लग्न करण्याचा कार्यक्रम ठरला आणि प्रेम करणारी ती युवती व दोघांचे नातेवाईक आले; मात्र लग्नातून नवरदेवाने पलायन केल्याने सर्वांचे धाबे दणाणले.
पहिल्यांदा येथील युवतीशी प्रेमसंबंध ठेऊन जाळ्यात अडकवले आणि लग्नाचे आमिष दाखवून दुसर्या मुलीशी साखरपुडा करणार्या प्रियकराचा साखरपुडा हाणून पाडल्याने मंगळवारपासून दोन कुटुंबात वाद सुरू होता. अखेर दोन्ही कुटुंबांनी चर्चा करीत प्रेम असलेल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सर्व तयारी करून दोन्ही कुटुंबे नृसिंहवाडी येथे लग्नासाठी आले असता नवरदेव लग्नात उपस्थित झाला आणि गाडी लावतो असे सांगून त्याने लग्न समारंभातून पलायन केले. आजपर्यंत आपण लग्नातून मुली पलायन केलेल्या घटना ऐकल्या आहेत तर नृसिंहवाडी येथून चक्क नवरदेवाने पलायन केल्याने शिरोळ तालुक्यात चर्चा रंगली होती. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी त्या पलायन केलेल्या नवरदेवाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

