मुंबई, 15 मे : आपला देश सर्वात जास्त खेड्यानी जोडला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पद्धती बऱ्यापैकी एकमेकांवर अवलंबून असते. गावातील शासकीय कार्यालयातील कामांची माहिती घेण्यासाठी शेतकरी अथवा गावातील सामान्य माणूस सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत असतो.
त्यामुळे गावातील चावडी ग्रामपंचायत नेहमी गजबजलेली असते. दरम्यान गावच्या महसूलाबाबत सर्वात जास्त माहिती तलाठ्यांना असते तसे अधिकारही त्यांना असतात परंतु तलाठी नेमके काय काम करतात याबाबत बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते यासाठी तलाठीची कामे काय असतात हे जाणून घेऊया.
तलाठ्यांना असलेले अधिकार
१) शेतकऱ्याच्या मागणीनुसार सर्व प्रकारचे उतारे व दाखले देणे.
२) वारस रजिस्टरला वारसाची नोंद करणे. वारस ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद फेरफार पुस्तकात करणे.
३) फेरफार पुस्तकात खरेदीखताची नोंद करणे.
४) पिक पाहणीची नोंद करणे. स्वतः मालक जमीन करत असल्यास खुद्द अशी नोंद करणे. अन्य व्यक्ती जमीन कसत असल्याचे आढळल्यास वहिवाट सदरी सदर व्यक्तीची नोंद करण्यासाठी फॉर्म नं. १४ भरून तहसिलदारांकडे पाठवणे.
५) तहसिलदारांनी जमीन वाटपाचा आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून वाटपानुसार वेगवेगळे ७/१२ करणे.
६) जमीन महसूलाची वसूली करणे.
७) शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे. उदा. निवडणूक काम, नुकसानीचे पंचनामे, तगाईचे वाटप, न्यायालयाच्या हुकूमाची अंमलबजावणी करणे आदि.
८) जमिनीत असलेली विहिर, बोअर तसेच फळझाडे, इकदार याची नोंद ७/१२ वर करणे.
तलाठीला या गोष्टीचा अधिकार नाही :
१) तलाठ्यास खाते फोडीचा अधिकार नाही. जमीन महसूल अधिनियमानुसार कलम ८५ अन्वये असे अधिकार तहसिलदारांकडे आहे. तहसिलदारांनी दिलेल्या खाते फोडीच्या आदेशाची अंमलबजावणी तलाठ्यास करायची असते.
२) ७/१२ वर होणारा कोणताही बदल हा फेरफार नोंदी द्वारेच करणे तलाठ्यावर बंधनकारक असते.
३) फेरफार नोंद मंजूर करण्याचा अधिकार तलाठ्यास नसून तो अधिकार मंडळ अधिकारी अगर सर्कल यांना आहे.
४) कोणत्याही मंजूर अगर रद्द केलेल्या नोंदीत फेरबदल करण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.
५) पिक पाहणी सदरी मूळ मालकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीचे नाव लावण्याचा अधिकार तलाठ्यास नाही. अन्य व्यक्तीची वहिवाट आढळल्यास तलाठ्याने फॉर्म नं. १४ भरून तहसिलदारांकडे पाठवावी. तहसिलदार त्याबाबत निर्णय घेतात.
६) नवीन शर्तीची जमीन विक्री करण्यास परवानगी देण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.
७) ७/१२ वरील कुठलाही शेरा कमी करण्याचा अधिकार तलाठ्यास नसतो. आणेवारी लावण्याचा अधिकार तलाठ्यांना नसून तहसिलदारांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी तलाठ्यांना काय अधिकार असतात पाहून त्यांच्याकडे मागणी करावी.

