“बारामतीच्या गांधीसाठी नथूराम तयार करण्याची वेळ आली आहे !” अशी एकाने सोशल मिडीयात पोस्ट केली आहे. हे अतिशय गंभीर आहे. शरद पवारांच्या नावे महाराष्ट्रात विद्वेष पेरण्याचे काम मोठ्या प्रमाणात रोज सुरू आहे आणि या विद्वेषाचे जनक आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांच्या मागची पिलावळ हेच काम करते आहे. काही दिवसापुर्वी एस टी आंदोलकांच्या आडोश्याने शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. सदरचा प्रकार अतिशय निंदाजनक आणि निषेधार्ह होता. एखाद्या नेत्याच्या घरावर चालून जाणे, शिव्या देणे, चप्पलफेक करणे हा एकूणच प्रकार विकृत होता. सदर आंदोलनाचे नेतृत्व अँड गुणरत्न सदावर्ते करत होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांची पुर्ण ताकद आहे. पोलिसांनी या प्रकारात सदावर्ते यांना अटकही केली होती. त्या हल्ल्याचा खरा मास्टरमाईंड गुणरत्न सदावर्ते आहेत की फडणवीस आहेत ? याचा पोलिसांनी कसून तपास करायला हवा. गेल्या काही वर्षात फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात जो पट मांडला आहे तो ‘डर्टी पिच्चर’ आहे. त्यांनी राजकारणाला ज्या पध्दतीने खालच्या स्तरावर आणले आहे तसे यापुर्वी कुणीच आणले नव्हते.
या पुर्वी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात जोरदार संघर्ष होता. एकमेकांवर टिकाही केली जात होती. बाळासाहेब ठाकरे पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ म्हणत होते, ‘मैद्याचे पोते’ म्हणत होते पण टिका करताना व्यक्तीगत द्वेषाच्या पिचका-या कधीच सोडल्या नाहीत. व्यक्ती द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. राजकारण सोडून त्यांच्यात चांगली मैत्री होती, त्यांचे संबंध चांगले होते. भाजप नेते गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनीही शरद पवारांच्यावर खुप टिका केली. पण टिका करताना व्यक्ती द्वेषाची कावीळ होवू दिली नाही. त्या टिकेला राजकारणापुरते मर्यादित ठेवले. त्यातून कधी विखार पेरला गेला नाही. गेल्या काही वर्षात भाजपाची सुत्रे जशी फडणवीसांच्या हातात आली आहेत तेव्हापासून राजकारणाचा स्तर बदलतो आहे. हा स्तर दिवसेंदिवस खालावतो आहे. राज्याच्या राजकारणातला फडणवीस सांप्रदाय व्यक्ती द्वेषाचा विखार पेरताना दिसतो आहे. त्यांच्या अवती-भोवतीचे सगळे लोक शरद पवारांच्यावर तुटून पडतात. टिका करायला हरकत नाही. राजकारणात टिका-टिप्पणी करणे, समिक्षण करणे, प्रश्न विचारणे गैर नाही. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग व जीवंतपणाचे लक्षण आहे. पण टिका करताना सभ्यता जोपासायला हवी, मर्यादा ठेवायला हवी. राज्यात फोफावलेल्या फडणवीस सांप्रदायाने ही सभ्यता केव्हाच ओलांडली आहे. या लोकांना सोशल मिडीयात फॉलो करणारी मंडळी शरद पवारांची रोज आई-बहिण काढतात. त्यांच्याबाबत अतिशय अश्लील, विकृत बोलतात. त्यांना बारामतीचा वाकड्या, लांडा, वाकड्या तोंडाचा असे काहीही विकृत बोलतात. विशेष म्हणजे असं बोलणारी सर्व जमात फडणवीस आणि भाजप समर्थक आहे. जे फडणवीस आणि भाजप समर्थक आहेत तेच असे सभ्यता सोडून, पातळी सोडून बोलताना दिसतात.
या पुर्वी हे फक्त सोशल मिडीयात सुरू होतं. गेल्या काही दिवसात ते राजकारणात चालू केले आहे. फडणवीसांचे खंदे समर्थक रोज पवारांच्यावर पातळी सोडून आरोप करत आहेत. चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर आदी मंडळी रोज उठसुठ पवारांच्यावर घसरल्याशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही. खरेतर या लोकांची यात काहीच चुक नाही. त्यांचे बोलविते धनी व त्यांच्या सांप्रदायाचे गुरू देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनीच या लोकांना मोकळे रान दिले आहे. शरद पवारांना रोज बडवा, त्यांची इमेज डॅमेज करा, पवारांना राजकारणातून, व्यक्तीगत आयुष्यातून संपवा असे आदेश दिले आहेत की काय ? असा प्रश्न पडतो कारण या मंडळीतले सगळे गत दहा पंधरा वर्षापासून अधिक काळ राजकारणात सक्रीय आहेत. तेव्हा यातले कुणीच पवारांना इतका टोकाचा विरोध करताना दिसले नाहीत. ज्या पध्दतीने ते आज विरोध करतायत, टिका करतायत तसा विरोध व टिका या पुर्वी त्यांनी कधीच केली नाही. चंद्रकांत पाटलांची भाजपातच काळ्याची पांढरी झाली. या पुर्वी म्हणजे भाजपाचे नेतृत्व फडणवीस सोडून इतर नेत्यांच्याकडे होते तेव्हा चंद्रकांत पाटील शरद पवारांच्यावर घसरत नव्हते. टिका केली असेल तर ती अपवादात्मक प्रसंगात. पण त्या टिकेला मर्यादेची झालर होती. तीच बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांची. ते मनसेत होते तेव्हा त्यांना शरद पवार वाईट असल्याचा साक्षात्कार नव्हता झाला. तो फडणवीसांच्या चरणी आल्यावरच झाला. तीच त-हा गोपिचंद पडळकरांची. त्यांनी विनोद तावडेंच्या बोटाला पकडून भाजपात प्रवेश केला. तदनंतर वंचीत आघाडीत गेले, त्या आधी त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडून लोकसभेची तिकीटही मागितली होती. तेव्हा त्यांनाही शरद पवार नालायक असल्याचे, कोरोना असल्याचे लक्षात आले नव्हते. तोवर ते शरद पवारांच्यावर अजिबात घसरत नव्हते, टिका करत नव्हते. पण त्यांना जेव्हा फडणवीसांनी बारामती मतदारसंघात तिकीट दिले, त्यांनी जेव्हा भाजपातला फडणवीस सांप्रदाय जॉईन केला तेव्हापासून ते शरद पवारांच्यावर घसरू लागले, त्यांच्यावर तोंडसुख घेवू लागले. ज्यांना ज्यांना फडणवीस टच झाला ते सगळे शरद पवारांच्यावर तुटून पडू लागले. पडळकर जोवर विनोद तावडेंसोबत होते तोवर कधीच पवारांच्यावर घसरलेले नाहीत. फडणवीसांच्या सोबत आले, त्यांना फडणवीशी स्पर्श (टच) झाला आणि त्यांची तोफ पवारांच्यावर धडधडू लागली. फडणवीसांना जर हे मान्य नसते तर त्यांनी या सर्व नेत्यांना समज दिली असती. टिका करताना मर्यादा ठेवायला लावली असती. पण फडणवीसांनी या लोकांना असे कधी सांगितल्याचे स्मरत नाही. फडणवीसांनी पक्षातले विरोधक संपवले. त्यांची पक्षातच वासलात लावली. तावडे, खडसे, पंकजा मुंडे यांची पुरती वाट लावली. त्यांच्या विरोधात तक्रार करणा-या सतिश उकेंचे प्रकरण तर ताजेच आहे. यातून फडणवीसांचा स्वभाव खूनशी व संकुचित असल्याचे जाणवते आहे. त्यांनी राजकारणात हा पायंडा पाडला आहे. या पायंड्याने राजकारणाचा दर्जा मात्र घसरत चालला आहे.
भाजपातले इतर नेते कधीच शरद पवारांच्यावर असे घसरत नाहीत. त्यांच्यावर विखारी टिका करत नाहीत. मोदींच्यापासून गडकरीपर्यंत सगळे नेते मर्यादेने बोलतात. पंकजा मुंडे, मुनंगटीवार, तावडे हे सगळे नेते मर्यादा ठेवून टिका करतात. पण ज्यांनी ज्यांनी फडणवीस सांप्रदाय जॉईन केला त्यांनी त्यांनी ही मर्यादा सोडल्याचे लक्षात येते. आज राज्यातल्या या फडणवीशी सांप्रदायात शरद पवारांच्याबाबत व्यक्ती द्वेषाचा विखार प्रचंड वाढलेला दिसतो. सोशल माध्यमातले त्यांचे फॉलोअर्स ज्या पध्दतीने विकृत बोलतात ते पाहता शरद पवारांना जीवंत ठेवण्यात अर्थ नाही. इतका वाईट माणूस त्यांनी जीवंतच ठेवू नये. फडणवीसांनी या सगळ्या उचापती करण्यापेक्षा शरद पवारांचा ‘खून’ च करावा. एकदाचा त्यांचा विषय संपवून टाकावा. स्वातंत्र्यानंतर ज्या पध्दतीने महात्मा गांधींच्या बाबत विखार पेरला गेला, द्वेष पेरला गेला तसाच द्वेष, तसाच विखार आज शरद पवारांच्याबाबत पेरला जाताना दिसतो आहे. तशीच भाषा पवारांच्या बाबत वापरली जाताना दिसते आहे. अतिशय हलकट पध्दतीने पवारांची आई-बहिण काढली जाते. यातल्याच एखाद्या नथूरामी प्रवृत्तीने शरद पवारांच्यावर शस्त्र उगारले तर आश्चर्य वाटणार नाही. सोशल मिडीयात एकाने तेच मांजले आहे. बारामतीच्या गांधीला संपवण्यासाठी नथूरामची गरज असल्याचे म्हंटले आहे. कारण तेवढा भयंकर विखार, द्वेष पेरला आणि पोसला जातो आहे. सोशल माध्यमात ते रोज पहायला मिळते आहे. कालच्या घटणेने याला पुष्टी मिळाली आहे. राजकारणात शरद पवारांनी अनेक चुका केल्या आहेत, त्यांच्या अनेक भूमिका पटत नाहीत, आवडत नाहीत पण म्हणून अशा पध्दतीचा द्वेष, तिरस्कार, विखार ही महाराष्ट्राची परंपरा नाही. फडणवीसांनी राजकारणात चालवलेला ‘डर्टी पिच्चर’ महाराष्ट्राला कुठे नेवून ठेवतोय काय माहित ?