खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका उसाच्या शेतात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. या महिलेची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असतानाही सांगली स्थानिक गुन्हे शाखेने केवळ एका रेल्वे तिकिटाच्या आधारावर या धक्कादायक खुनाचा छडा लावला आहे.
या प्रकरणात मृत महिलेचा दुसरा पती आणि सासऱ्यानेच तिचा काटा काढल्याचे उघड झालं असून, पोलिसांनी आरोपींना हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत.
नीतू उर्फ शालिनी यादव (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) हिचा खून तिचा पती आकाश उर्फ विनायक दीनदयाळ यादव आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव यांनी मिळून केला होता. नीतू ही तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती, त्यानंतर तिची ओळख आकाशसोबत झाली आणि दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात खटके उडू लागले. नीतूने पतीविरोधात पोलीस तक्रारही केली होती. हा राग आकाशच्या मनात होता. पत्नीकडून वारंवार होणारा त्रास आणि तिच्या चारित्र्यावरील संशयामुळे बाप-लेकाने तिला संपवण्याचा कट रचला.
आरोपींनी 16 डिसेंबर रोजी नीतूला जौनपूरवरून रेल्वेने मिरजमधील टाकळी येथे आणले आणि तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. गुन्हा केल्यानंतर आरोपी पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशला पळून गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेला घटनास्थळाच्या पाहणीत मृतदेहापासून काही अंतरावर एक रेल्वे तिकीट सापडले. या एका धाग्यावरून तपास सुरू झाला. मिरज रेल्वे स्टेशनबाहेरील एका चिक्की विक्रेत्याकडे केलेल्या आर्थिक व्यवहाराचा पुरावा मिळाल्याने पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचणं सोपे झाले.
दरम्यान, सांगली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत मुख्य आरोपी आकाश याला हरियाणा येथून तर वडील दीनदयाळ यादव याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. केवळ एका रेल्वे तिकिटाने या ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावल्याबद्दल सांगली पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

