जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील घेरडी गावात शेतकऱ्यांच्या आसूड मेळाव्यामधून शेतकरी कर्जमुक्तीचा एल्गार होणार असून या मेळाव्यासाठी जत तालुक्यातून हजारो शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले.
जत शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश सरचिटणीस अजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किसन टेंगले, जिल्हाध्यक्ष बंडू डोंबाळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जत तालुकाध्यक्ष सुनील बागडे, अकील नगारजी, श्रावण मोटे यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगोला तालुक्यातील घेरडी गावामध्ये शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजता घेरडी ग्रामपंचायत समोरील पटांगण, घेरडी येथे शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळ बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड मेळावा आयोजित केला असून यामधून एल्गार शेतकरी कर्जमुक्तीचा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चु कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जत तालुक्यामधून हजारो शेतकरी बांधव येण्याकरिता ताकतीने नियोजन करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले.
शेवते म्हणाले, राज्यातील शेतकरी आज कर्जाच्या बोज्याने मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या अवकृपेने मोठ्या संकटाला सामोरे जात असताना राज्यांमध्ये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार होती, पण आज ही मिळालेली नाही. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि अशा अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा मेळावा होणार असून जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

