जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीतील जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर असलेले राजारामबापू पाटील नावाच्या ऐवजी ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ अशा नावाचा फलक लावण्यात आला आहे.
या घटनेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट करून टीका करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना डिवचलं होतं.
‘तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग जतच साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही, मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे, असा इशारा पडळकर यांनी दिला होता.
अशातच आता पडळकरांनी इशारा दिल्यानंतर काल रात्री या साखर कारखान्याचे नाव बदलल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा फलकावर रात्रीत ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असं नाव कोणी लिहिलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना असून हा सभासदांचा कारखाना असून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका पडळकरांनी घेतली आहे.
शिवाय हा कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही पडळकरांनी दिला आहे. त्यामुळे आता कारखान्याच्या फलकावरील नाव कोणी बदललं हे अद्याप समोर आलं नसलं तरी या नाव बदलल्याच्या मुद्द्यावर पडळकर आणि पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

