खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन झाल्याचं दुर्दैवी वृत्त समोर आलं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शिवाजी कर्डिले यांची प्राणज्योत मालवली.
ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
मोठ्या आजारातून ते नुकतेच बरे झाले होते. पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने नगर शहरतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी निधन झाल्याचे सांगितले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने कुटुंबीयांसह समर्थकांवर शोककळा पसरली आहे.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या गावातील शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे.
कोण होते शिवाजीराव कर्डीले?
शिवाजीराव कर्डीले २००९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे होते. त्यांनी ५७ हजार ३८० मतं मिळवून विजय संपादन केला होता. २०१४ मध्येही ९१ हजार ४५४ मतांनी विजय मिळवला होता.
सुरुवातीला त्यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ ते गावचे सरपंच राहिले होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्याभरात झाले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते.

