खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज तालुक्यातील आरग येथील विजेच्या आघातात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी उदय विठ्ठल माळी यांच्या कुटुंबाला आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत तर श्रावणबाळ योजनेसाठीही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
आरग (ता. मिरज)दि. २२ एप्रिल २०२५ रोजी विजेचा आघात होऊन शेतकरी उदय विठ्ठल माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी कुटुंबावर संकट कोसळले असून कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे.
या दुर्घटनेनंतर आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागांशी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत माळी कुटुंबासाठी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली. आज ही रक्कम अधिकृतरीत्या माळी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.
ही मदत त्यांच्या दुःखावर फुंकर घालू शकणार नाही, परंतु येणाऱ्या अडचणीच्या काळात ती उपयोगी ठरेल, असे आमदार डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, माळी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी भविष्यात जे काही शक्य होईल ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. विशेषतः माळी यांच्या दोन अल्पवयीन मुलांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत नियमित पेन्शन सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून ती लवकरात लवकर सुरु केली जाईल, असे आश्वासनही आमदार डॉ. खाडे यांनी दिले.


