जालना येथील सभेमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना भाजप पुरस्कृत आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली असल्याचं पाहायला मिळालं.
‘मुख्यमंत्री हे चिल्लरवाला गडी आहे,’ असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, पवार कोणाची औलाद हे महाराष्ट्राला कळू द्या, असं म्हणत सदाभाऊ यांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.
सदाभाऊ खोत यांनी ‘जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा’ नावाने यात्रा सुरू केली. महाराष्ट्रभर चालणारी ही यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली. शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा राज्यव्यापी दौरा असल्याचं म्हणत महाविकास आघाडीवर सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला आहे. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
‘मुख्यमंत्री असून नसल्यासारखे. त्या बिचाऱ्याला अधिकार काय नाय. एका बाजूला काँग्रेसवाले तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीवाले आहेत. ते जरा चूळबूळ करायला लागलं की म्हणत्यात खाली यायचं नाय, याद राख तिथंच बसायचं आणि पवारसाहेब हुशार आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त पैसे हाना ते जरा दंगा करायला लागलं की त्याच्या अंगावर चिल्लर टाका.
कारण पवाराला माहित आहे की तो चिल्लरवरचा गडी आहे. त्याला लय द्यावं लागत नाय. तो चिल्लर खातंय आणि हे नोटा खातंय असा कारभार महाराष्ट्रात सुरु असल्याचं,’ सदाभाऊ खोत म्हणाले.
पुढे सदाभाऊ खोत म्हणाले, ‘आमचं सरकार सत्तेवर आलं शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार भरणार, तरुणाच्या हाताला काम देणार, 300 यूनिट वीज मोफत देणार असं शिवसेनेच्या जाहीरनाम्यात होतं.
ते काही मिळालं नाही पण विजेची कनेक्शनं कट केलीत. तर, आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार, शेतकऱ्याला वीज फुकट देणार, एसटीच विलिनीकरण करणार असं अजितदादा बोलताना म्हटले होते.
तर, जर हे आम्ही नाही केलं तर पवाराची औलाद सांगणार नाय, पवाराचं आडनाव लावणार नाय.
मला आता प्रश्न विचारायचाय तुमची औलाद कोणती ? हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या.’ असं खोत म्हणाले.

