सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करत असले तरी भाजप विरोधात मात्र त्यांनी मौन पाळल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
इतकंच नाही तर राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केलाय. नीलम गोऱ्हे आज सांगलीत बोलत होत्या. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपनं राज ठाकरे यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप करण्यात आला होता.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत. पण भाजप काम झाले की राज ठाकरे यांना वाऱ्यावर सोडेल. इसापनीतीची कथा अशीच आहे. आम्ही भाजपचा अनुभव घेतला आहे. भाजप त्यांनी तिकीट वाटपावेळी वाऱ्यावर सोडून देईल. कारण भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात. त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल.

