खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कडेगांव तालुक्यातील नेवरी ग्रामपंचायतमधील सत्ताधाऱ्यांना सध्या त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, जनता पावसाळ्यात रस्त्याने व्यवस्थित चालू शकत नाही अशी अवस्था आहे आणि युवानेते मात्र अजूनही आश्वासनच देत आहेत त्यामुळं आता जनतेला आश्वासन नको तर कृती पाहिजे अन्यथा जनतेचा रागाचा उद्रेक होईल असा इशारा काँग्रेसचे नेते संजय महादेव महाडीक यांनी दिला आहे. ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस प्रणित आघाडीची सत्ता असताना काँग्रेस नेतेच कारभाराबाबत उघड उघड नाराजी व्यक्त करू लागल्याने नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
यावेळी महाडीक पुढं म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही सुद्धा सत्ताधाऱ्यांना मतदान केलं आहे एवढच काय तर आम्ही त्यांचा प्रचार सुध्दा केला आहे. निवडणुकीच्या वेळी युवा नेत्याने आमच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यास निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगितले होते .आज या गोष्टीला जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली. मंजूर करून आणलेला निधी नक्की कुठ अडकला आहे हेच कोडे आजवर या भागातील जनतेला उलगडलेलं नाही. प्रत्येक पावसाळ्यात इथ रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते, लहान मुले आणि स्त्रियांना इथून चालता येत नाही. प्रत्येक पावसाळ्यात आम्ही तक्रार केली की मोठमोठ्या आकड्यांची बतावणी आमच्यासमोर केली जाते. आता या आकड्यांचा आम्हाला कंटाळा आला असून आश्वासन नको तर आता कृती पाहिजे.
याठिकाणी रस्त्यावरून चालताना अथवा दोनचाकी गाडीवरून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. गावातील इतर ठिकाणी छोट्या छोट्या रस्त्यांना निधी मिळत आहे मग या ठिकाणी मोठा आणि कायम रहदारीचा रस्ता असताना मागणी करुनही निधी का दिला जात नाही? प्रत्येक वेळी रस्ता दुरुस्तीची मागणी केली की सह्यांच्या अर्जाची मागणी केली जाते मग यापूर्वी सह्या करून मागणी केलेले अर्ज नक्की कुठ गेले ? हा आमचा प्रश्न आहे.इथली जनता आता आश्वासनांना वैतागली असून नेत्यांनी या रस्त्यासाठी ठोस पावले न उचलल्यास जनतेच्या रागाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर कोणामुळे ?
गावातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यापूर्वीही कलह असायचा मात्र तो कोणीही उघड उघड बोलून दाखवायचं नाही. वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी बोलून दाखवली की वरिष्ठ पातळीवर चर्चा घडवून नाराजी सोडवली जायची आणि गावातील कार्यकर्ते एकदिलाने काम करायचे मात्र हल्ली हे होताना दिसत नाही. पक्षाचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुध्दा नाराजी उघड उघड बोलून दाखवत आहे.याचाच फटका विधानसभा निवडणुकीत बसला असल्याचे बोलले जात आहे. हे सगळं कशामुळे व्हायला लागलं आहे नक्की काय चुकतंय याचा विचार वरिष्ठ मंडळी करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.