सांगली; खबऱ्या प्रतिनिधी/ जिल्ह्यात संभाव्य पुराचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा. आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवा.
अलमट्टी व सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण व्यवस्थापन यंत्रणांशी समन्वय ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारीची आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवावे. आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालमी घ्या. बाधित क्षेत्रात बोट चालविणार्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण द्या. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्यासाठी कर्मचार्यांच्या नियुक्ती करा. ते पुढे म्हणाले, कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुद्ध माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवावा. तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध धरणे व वारणा धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवा. पावसाळ्यात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी.
जिल्हाधिकारी म्हणाले, यापूर्वी पाण्यामुळे जिल्ह्यातील जे रस्ते बंद झाले होते, त्याची यादी तयार करा. पुरामुळे पाण्याखाली जाणार्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्रीची तयार करा. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे तसेच रस्ता खचून वाहतूक बंद होणार नाही, याबाबतची यंत्रणा सज्ज ठेवा. पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी नियोजन करा. इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास पूरबाधित गावांमध्ये निवारागृहांची उपलब्धता ठेवा. आयुक्त कापडणीस म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे. विभागनिहाय 247 पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांची जागाही निश्चित करण्यात आली आहे.

