आगामी आमदारकीसाठी मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नव्या चेह-याचा शोध सुरू झाल्याने इच्छुकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
भाजपचे पालकमंत्री असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातुन खासदारकीला विशाल पाटील यांना भरमसाठ मताधिक्य मिळाल्याने तसेच मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधातील नाराजी कॅच करण्यासाठी महाविकास आघाडीत तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे .

गतवेळी आघाडी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाळासाहेब होनमोरे यांच्या रूपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिरज विधानसभा मतदारसंघात उसणा उमेदवार दिला होता. यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचं कळतंय .
हातकणंगलेचे माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदारकीसाठी दावा केल्याने इच्छूकांच्यात खळबळ माजली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने माजी आमदार राजीव आवळे यांना महाविकास आघाडीने आमदारकीचे तिकीट द्यावे अशी मागणी होत आहे . विशेष म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीच राजीव आवळे यांची उमेदवारी उचलून धरल्याचा त्यांचे कार्यकर्ते दावा करतात. मिरज विधानसभा मतदारसंघातील जयंतराव पाटील यांचे सगेसोयरे यामध्ये महत्वाची भुमिका बजावत असल्याची चर्चा आहे. राजीव आवळे यांच्या मिरजेतील संभाव्य एंट्रीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या उमेदवारीवर गंडातर आले आहे .माजी आमदार राजीव आवळे यांनी महिन्यांपूर्वीच मिरजेतील प्रमुख नेतेमंडळीशी संपर्क साधुन उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केल्याचे सांगण्यात आले . राष्ट्रवादीकडून विज्ञान माने सुध्दा तिकीटासाठी हात पाय आपटत आहेत . या इच्छुकांच्या भाऊगर्दीत कुणाला आमदारकीच्या तिकिटाच्या जॅकपॉट लागतो ? याबद्दल मतदारसंघात उत्सुकता ताणली आहे .

शिवसेनेकडून सिध्दार्थ जाधव हे महा विकास आघाडीचे तिकिट फिक्स असल्याचा दावा करताहेत . मिरजेतील शिवसेनेचेच तानाजी सातपुते यांनी सुध्दा तिकिटासाठी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली आहे . कॉंग्रेसमधुन सी आर सांगलीकर , मनोज सलगर अशी इचछूकांची भलीमोठी रांग लागली आहे . जयंतराव पाटील यांनी माजी आमदार राजीव आवळे यांच्या तिकिटासाठी वजन खर्च केले तर पुन्हा सांगली लोकसभेच्या वेळी जी परिस्थिती निर्माण झाली त्याची मिरज विधानसभा मतदारसंघात पुनरावृत्ती होणार आहे . माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विश्वजित कदम यांच्यावरती उध्दव ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांचा दात आहे . विधानपरिषद निवडणुकीत विश्वजीत कदम यांचे मत फुटल्याच्या उध्दव ठाकरे गटाने कंड्या पिकवलेल्या होत्या तर शिराळ्याचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी क्रॉस वोटींग केल्याचा आरोप विधानपरिषदेचे पराभुत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांनी केला आहे . या साऱ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत सारेच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत .
तिकडं भाजपमध्ये मोहन व्हनखंडे यांनी विद्यमान आमदार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांची डोकेदुखी वाढवल्या . मिरजेतील वॉन्लेस हॉस्पीटलच्या कामगारांना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आंगठा दाखवल्याने विरोधकांना हा प्रचारासाठी आयताच मुद्दा सापडलाय . मिरज शहर हे मेडीकल हब असताना पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मंत्री असुनही सुरेश खाडे काहीच ठोस काम करु शकले नाहीत हा मुद्दाही विरोधक आतापासूनच तापवत आहेत . त्यामुळे मिरज विधानसभेची आगामी निवडणुक लक्ष्यवेधी ठरणार आहे !!!


