कडेगाव:- तलाठी दिलीप चौरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून तात्काळ निलंबित करा अन्यथा आंदोलन करू असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडेगाव तालुका युवक आघाडीचे वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे, अरुण झगडे , राज झगडे, राहुल कांबळे, परशुराम माळी, पांडुरंग गुजले उपस्थित होते निवेदन निवासी नायब तहसिलदार विलास भिसे यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हंटलं आहे की, कडेगाव तालुक्यातील मौजे वांगी गावातील मागासवर्गीय समाजातील राहुल आनंदा कांबळे व येतगाव येथील अरुण सुधाकर झगडे यांनी आमच्या पक्षाकडे तलाठी चौरे यांचेकडून झालेल्या भ्रष्ट व बेकायदेशीर केलेल्या कामाबाबत दिलेल्या तक्रारीस अनुसरून आपणास कळवित आहोत की तालुक्यात कार्यरत असलेले तलाठी चौरे यांनी मौजे वांगी येथील कार्यभार असताना राहुल आनंदा कांबळे या मागासवर्गीय समाजातील कुटुंबातील जमीन गट नंबर १६७३,१७०४, १५७० व २४०६ यातील वारस नोंदी संदर्भात संबंधित लोकांनी अर्ज केला असता त्यांची वारस नोंद न करता त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणी केली असता त्यांना २० हजार रुपये रोख व मध्यस्थी नंदकुमार सवणे यांचे मार्फत ४० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये तलाठी चौरे यांनी घेतले होते एवढी आर्थिक पिळवणूक करून सुद्धा या कुटुंबाची वारस नोंद न करता त्यांना आज अखेर बेदखल केले आहे याबाबत वरिष्ठांकडे पीडित लोकांनी तक्रारी अर्ज दाखल केले होते परंतु या मागासवर्गीय लोकांना आज अखेर न्याय मिळाला नाही.
तसेच जमिनीच्या बेकायदेशीर नोंदीच्या प्रकरणाबाबत तलाठी दिलीप चौरे यांनी वांगी येथे दि १०/८/१९९९ रोजी रद्द झालेल्या फेरफार क्र ५२५३ ची दुबार नोंद फेरफार क्र १६०७९ ने धरली आहे जी पूर्णपणे बेकायदेशीर व आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे.तसेच या ठिकाणीच २/६/२०१० रोजी मंजूर असणाऱ्या मात्र अंमल न दिलेल्या फेरफार क्र ९९२४ ची ही दुबार नोंद फेरफार क्र १५५५० ने धरली आहे जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.तर येतगाव या आणखी अतिरिक्त असणाऱ्या दुसऱ्या सजेच्या ठिकाणी वारसनोंद करीत असताना फेरफार क्र ९८५५ ने गट नंबर १९१ /अ मध्ये फक्त मयत शेतकऱ्याचे नाव असताना तलाठी चौरे यांनी गट नंबर १९१/ब हा सुद्धा फेरफार मध्ये जाणूनबुजून घातला आहे व त्याचा चुकीचा अमल दिला आहे. गट नंबर १९१/ब ला मयत शेतकऱ्यांचे नाव नसताना त्यांच्या वारसांची नावे चढवण्याचा महाप्रताप चौरे यांनी केला आहे.
वैशिष्ट्य म्हणजे हे तिन्ही महाप्रताप चौरे यांनी आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार असताना केला आहे. या प्रकरणांत संबंधित तलाठ्यास तेथील मंडळ अधिकाऱ्यांनी ही मदत केल्याचं दिसत आहे. अतिरिक्त कार्यभार असताना सातबारा एकाचा आणि वारसनोंद दुसऱ्याची अशी किमया तलाठी चौरे व मंडळ अधिकाऱ्यांनी केली खरी मात्र ती ही करीत असताना कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झालं आहे. वारसनोंद धरीत असताना कायद्याने त्याची अगोदर वारसा रजिस्टर ला नोंद करून ते वारसा रजिस्टर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेणे गरजेचं आहे, व त्याच्या वारसनोंदीचा फेरफार धरताना सदर फेरफार मध्ये मंजूर वारसा रजिस्टर नंबर नमूद करावा लागतो त्याशिवाय ऑनलाइन फेरफारच धरला जात नाही. मात्र याठिकाणी चौरे यांनी पूर्ण वारसनोंदच बेकायदेशीर धरायची आहे असे बहुधा ठरवले असावे, त्यामुळं त्याची वारसा रजिस्टरला नोंद केली नाही आणि त्यामुळे त्यास मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरीचा प्रश्न आला नाही.
आता वारसनोंदीचा फेरफार धरताना वारसा रजिस्टर नंबर टाकावा लागणार म्हणून चौरे यांनी फेरफार प्रकार वारसनोंद म्हणून न धरता इतर फेरफार म्हणून धरला. या ठिकाणी आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार किती दिवस राहील हे सांगता येत नसल्याने घेतलेली सुपारी कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी ह्या मधल्या आणि बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला आहे. या प्रकरणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मयत पती पत्नी शेतकरी हे अनुक्रमे १९९९ व २००६ साली मयत झाले आहेत आणि त्यांची वारसनोंद २०२० ला तलाठी चौरे यांनी घातली. एकूण वरील सर्व प्रकरणे अतिशय गंभीर असून तलाठी चौरे यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचणारी आहेत. सदर सर्व प्रकरणांची सर्व कागदोपत्री पुरावे आम्ही सादर करत आहोत. आमच्या वरवरच्या पाहणीवरून आम्हाला तलाठी चौरे यांची ही गंभीर प्रकरण सापडली आहेत त्यामुळं अशाप्रकारची आणखी प्रकरणं त्यांनी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या गंभीर प्रकरणाची येत्या दहा दिवसात चौकशी होऊन तलाठी चौरे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवा आघाडी कडेगाव तालुक्याचे वतिने मंगळवार दि १०/०५/२०२२ रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहोत.

