Uddhav Thackeray । सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले की, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे आम्ही ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. शाखेवर बुलडोजर फिरवायला कोणी सांगितले? उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि २०२४ नंतर ते परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत हे विसरू नका, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
मुंब्रा येथील शाखेवरून शिंदे गट अणि ठाकरे गट यांच्यात मोठा वाद झाला होता. यांनतर आता आज उद्धव ठाकरे या ठिकाणी पाहणी करण्याकरिता येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते मात्र काही अज्ञात व्यक्तींनी ते बॅनर फाडले आहेत. त्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
त्याचबरोबर संजय राऊत यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मुंब्रा्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. आम्ही आज ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. कोणाच्यात हिंमत असेल तर आम्हाला अडवून दाखवा असं आव्हान संजय राऊतांनी केल आहे.


