मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर होते. ठिकठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते.
सभांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत जनजागृती केली. अशात उद्या जरांगे पाटील आंतरवली सराटी येथे आरक्षणासाठी विराट सभा घेणार आहेत. यावरूनच आता जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
उद्याची सभा ही हिंसक होईल, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते यांनी संभाजीनगर पोलिसांना याबाबत एक पत्र देखील लिहिले आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेला परवानगी देऊ नका असा उल्लेख सदावर्ते यांनी आपल्या पत्रात केल्याचे समजते. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या उद्याच्या सभेला आपला विरोध दर्शवला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.
जरांगे पाटील यांच्या उद्या होणाऱ्या सभेकडे अवघ्या राज्यच लक्ष लागून आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील काही दिवसात संपणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या निर्णयाकडे अवघ्या मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.