एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना अपात्र करण्यात यावे तसेच शिवसेना (Shivsena) हे चिन्ह ठाकरे गटाला मिळावे यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. परंतु, न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.
त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपद दिली जाणार असून याच पार्शवभूमीवर काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेले होते. त्यांनी याबाबत तीन ते चार तास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा केली.
या बैठकीत मंत्रिमंडळ (Cabinet) विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला असे सांगितले जात आहे. यामध्ये शिंदे गटातील दोन नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील दोन मंत्र्यांना डावललं जाणार आहे. त्यामुळे आता हे दोन मंत्री कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत यापूर्वीही अनेक बैठका पार पडल्या असल्याने सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

