तहसीलदार बदलले, कर्मचाऱ्यांची मानसिकता कधी बदलणार?
बाहेरील समस्यांबरोबर आतील बेशिस्ती बरोबर शेलार यांना लढावे लागणार
कडेगाव :-चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरण चौकशी साठी जवळपास चार महिन्यांपूर्वी आले असताना सदर प्रकरण तहसील कार्यालयात सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यातून कडेगाव तहसील कार्यालयात किती भोंगळ कारभार सुरू आहे हे स्पष्ट होत आहे.कडेगावचे तहसीलदार बदलले असले तरी येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे. कडेगावचे नवनियुक्त तहसीलदार अजित शेलार यांना कार्यालयाबाहेरील समस्यांबरोबरच कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बेशिस्ती बरोबर ही लढावं लागणार असल्याचं दिसून येत आहे.
कडेगाव तहसील कार्यालय गेल्या काही दिवसांपासून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलं आहे. तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारावर गोपनीय खबऱ्याने नेहमीच सडेतोड लिखाण केले आहे.चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्यावर ही कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्याची चौकशी करून सविस्तर अहवाल पाठवणे कामी उपजिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना कळवले होते. सदर प्रकरण प्रांत कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आलं होतं.सदर प्रकरण सध्या गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापूर्वी येतगाव येथील शेतकऱ्याच्या ही तक्रारीची सर्वच कागदपत्रे गहाळ झाली होती. रस्ता केस असेल किंवा सातबारा दुरुस्ती लोकांना तुमचं प्रकरण सापडत नाही हे उत्तर हमखास कार्यालयातील लोकांकडून ऐकायला मिळतं. ही बाब अतिशय गंभीर असून यावर लक्ष केंद्रित करून तहसीलदार अजित शेलार यांना सहकारी व कर्मचाऱ्यांना स्वतः सारखी शिस्त लावावी लागणार आहे.
शेलार हे शिस्तप्रिय आणि सर्वसामान्य लोकांना केंद्र बिंदू मानून काम करणारे अधिकारी असल्याचं बोललं जातं आहे मात्र जोपर्यंत त्यांचे सहकारी कर्मचारी शिस्त प्रिय होत नाहीत तोपर्यंत काहीही उपयोग नाही असं बोललं जातं आहे. काही ठिकाणी त्यांना कठोर निर्णय घेतल्या शिवाय बेशिस्त झालेलं कार्यालय शिस्तप्रिय होणार नाही हे निश्चित. आता यावर शेलार काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

