गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार :- विक्रम पाटील
इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची कायद्याच्या दृष्टीने कामाची पद्धत चुकीची आहे. ते पोलीस ठाण्यात बसून “शिंदे फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही,” असे चर्चा करत असतात. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत दिवसाढवळ्या विनयभंग, जबरी चोरी, चेन स्नेचींग असे प्रकार घडत आहेत. न्याय मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांना शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.
इस्लामपूर शहरासह परिसरात सावकारी, अवैध धंदे, चोरी, घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फाळकूट दादांनी आपले कारणामे सुरू केले आहेत. त्यांच्याकडून खुणी हल्ले, खंडणी, जबरी चोरीचे, प्रकार सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला इस्लामपूर पोलिसांची जरब ढीली होत चालली आहे. पोलीस ठाण्यातील काही मलईखोर कर्मचाऱ्यांमुळे पोलीस ठाणे बदनाम होऊ लागले आहे. पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांचे त्यांच्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मधील शिंदे गटाचे जिल्ह्याचे प्रमुख हे इस्लामपूरचेच आहेत. तर पालकमंत्री भाजपचे आहेत. तरीही एका पोलीस निरीक्षकाकडून सरकार जास्त काळ टिकणार नाही असं थेट भाकीत केलं जातं..? याचाच अर्थ संबंधित पोलीस निरीक्षक कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहे, हे पाहणे गरजेचे आहे.
इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावागावात मारामारी, खुणी हल्ले, छेडछाड, विनयभंग, अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात मुलांची किरकोळ भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना येथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मुलांच्या रांगेत उभे करून शंभर उठाबशा काढायला लावल्या. शहरातील एका भागात गांजा तस्करी जोमात सुरू आहे. याप्रकरणी एका वृत्तपत्राने इस्लामपुरात खुलेआम गांजाची तस्करी असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांची भंबेरी उडाली होती.
शहरात पानपट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक पानपट्ट्यांमधून खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. गुटख्याची विक्री करतोय एक आणि दुसऱ्या पानपट्टी धारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात वारंवार घरफोडीचे प्रकार घडत आहेत. बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे. शहरात फाळकूट दादांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्याकडून खंडणी, सावकारी, जबरी चोऱ्यांचे, प्रकार वाढू लागले आहेत. गांजा तस्करीचे रॅकेट इस्लामपूर पर्यंत पोहोचले आहे. मोबाईल वरून मटका चिट्टी घेतली जात आहे. त्यातच पोलिसांची खाबुगिरी शहरात चर्चेचा विषय बनली आहे.