कोल्हापूर, खबऱ्या प्रतीनिधी : शहर, उपनगरामध्ये गुंडागर्दी, मारामारी तसेच घातक शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविणार्या वारे वसाहतीमधील कुख्यात व्हीसी बॉईज टोळीतील समाजकंटकांना जोरात झटका देण्यात आला आहे.
टोळीचा म्होरक्या संजय अशोक आवळे याच्यासह 12 गुन्हेगारांवर जिल्ह्यातून वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी मंजुरी दिली आहे, असे राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
तडिपार कारवाई झालेल्यांत म्होरक्या संजय आवळे, स्वप्नील ऊर्फ सागर चौगुले, सरदार आवळे, गजानन गणेशाचार्य, विश्वजित चौगुले, निवास आवळे, विलास आवळे, अमित घाडगे, अक्षय लोखंडे ( सर्व रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ) अवधूत खटावकर (रा. हनुमाननगर पाचगाव रोड), धीरज शर्मा (जोतिर्लिंग कॉलनी. पाचगाव, ता. करवीर), स्वप्नील गाडेकर (सुभाषनगर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, आणखी दोन टोळ्यांतील साथीदारांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे नाळे यांनी सांगितले. त्यात शहरातील एका कुख्यात मटका बुकीसह त्याच्या मुलाचाही समावेश शक्य आहे.
व्हीसी बॉईज टोळीच्या म्होरक्यांसह साथीदारांनी दीड-दोन वर्षांपासून शहर, उपनगरामध्ये प्रचंड दहशत माजवली आहे. संशयितांवर वेळोवेळी प्रतिबंध कारवाई होऊनही वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने पोलिस निरीक्षक नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी संबंधितांच्या तडिपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे दाखल केला होता.
बलकवडे यांच्या शिफारशीनुसार हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी करवीर प्रांताधिकार्यांकडे सादर करण्यात आला होता. नावडकर यांच्यासमोर सुनावणी होऊन एकाच वेळी 12 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडिपार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

