मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा अट्टाहास केल्याने अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यानंतरही त्यांनी हनुमान चालिसेचा मु्द्दा लावूनच धरला होता.
या दोघांवर राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेतून टीका केली आहे. तसंच त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप करणारे संजय राऊत लेहमध्ये त्यांच्यासोबतच जेवत होते, यावरूनही टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ते आपल्या विरोधात एकत्र येतात, बाकी वेळी भांडत असतात. म्हणजे बघा ना ते राणा मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेले होते. अरे मातोश्री बंगला काय मशीद आहे का?त्यांना अटक केली, मग ते आत होते, मधू इथे आणि चंद्र तिथे, मग ते एकत्र आले, त्यांना सोडलं. शिवसेनेकडून वाट्टेल ते बोलले, शिवसेना वाट्टेल ते बोलली. एवढ्या सगळ्या ड्रामानंतर हे दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, खांद्यावर हात ठेवून फिरताय. ह्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे.
खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. राणा दाम्पत्याला तुरुंगात जावं लागलं होतं. १२ -१३ दिवस कारागृहात राहिल्यानंतर अखेर या दोघांची भेट झाली. तेव्हा हे दाम्पत्य भावनिक झालेलं दिसून आलं. त्यावेळी त्यांचे रडतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. तर राणा दाम्पत्यावर या दरम्यान जोरदार टीका करणारे संजय राऊत लेहमध्ये त्यांच्याच सोबत गप्पा मारत जेवण करताना दिसले. यावेळचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरूनही बऱ्याच चर्चा घडल्या होत्या.