मिरज शहर आणि ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शुक्रवारीदेखील सुरूच होता. पावसाच्या संततधारेमुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
त्यामुळे शहरात दैना उडाली आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण असले तरीही वातावरणात उष्मा जाणवत होता. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वार्याला सुरुवात झाली. काही वेळातच जोराचा पाऊसही सुरू झाला. या पावसामुळे शहरात रस्त्यावरून पाणी पळत होते.
अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे लोकांची चांगलीच धावपळ झाली. शहरवासीयांना या पावसाने मात्र गारवा दिला. गुरुवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. शुक्रवारीही दिवसभर संततधार सुरूच होती. या पावसाने मालगाव रस्ता, समतानगर यासह विविध भागात पाणी साचले होते. त्यामुळे पाणी साचलेल्या रस्त्यातून ये -जा करणार्यांना त्रास झाला.
काही ठिकाणी रस्ते न झाल्याने चिखल साचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम तीन दिवसांपूर्वी सुरू झाले होते. आता पावसामुळे हे काम पुन्हा बंद झाले आहे. या रस्त्यावर पूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. या रस्त्यावर चिखल झाला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणार्यांना त्रास होत आहे. मालगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच रस्त्यावरील तोडकर गिरणी जवळही पाणी साचले आहे. या पावसामुळे मिरजेतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.