खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सोलापूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण चांगलेच तापले असून प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आलेल्या सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. अखेर 24 तासानंतर प्रणिती शिंदे यांनी मौन सोडले असून आरोपावर सडेतोड उत्तर दिले आहे. वक्तव्य करताना भान ठेवा, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सुनावले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी थेट आरोप करत म्हटले की, प्रणिती शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आधीच राजकीय तडजोड म्हणजेच डील ठरलेली आहे. प्रणिती शिंदे या ऑक्टोबर महिन्यातच भाजपमध्ये जाणार होत्या. मात्र, आगामी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबण्यास सांगितले आहे.
सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याने आज दिवसभर काँग्रस – भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळाले. राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चांना उधाण आले होते. अखेर इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर स्टोरी लिहीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जनमाणसात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य विरोधकांना मदत करतात, याचे भान मित्रपक्षाने ठेवावे,असे म्हणत सुनावले आहे.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
नॉर्मली अशा विधानांना मी उत्तर देत नसते पण महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना अशी विधानं जनमानसात संभ्रम निर्माण करतात आणि एक प्रकारे विरोधकांना मदत करतात याचे भान प्रत्येक मित्र पक्षाने ठेवावे. माझ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत देखील अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या. अशा अफवांना बळी पडू नका आणि संविधानाच्या उरावर बसू पाहणाऱ्या धूर्त शत्रूशी आपला लढा आहे … अशी बेलगाम विधानं करून आपली लढाई कमकुवत करू नका हीच माझी त्यांना विनंती आहे.

